कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी
अक्षराज : विनोद वास्कर
दि .२३ , ठाणे : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी ईमेलद्वारे करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांना सादर केलेल्या निवेदनात, ठाणे जिल्ह्याच्या या महत्वाच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, उड्डाणपूलामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि श्रम वाचेल, तसेच वाहतुकीचा वेग वाढून जीवनमानात सुधारणा होईल. केंद्र सरकारने देशभरात रस्ते विकासाचे जे व्यापक व दूरदृष्टीपूर्ण कार्य सुरू केले आहे, त्यात कल्याण फाटा येथील प्रकल्प समाविष्ट करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासन व जनतेकडूनही या प्रकल्पाबाबत मोठ्या प्रमाणात पाठिंबा असून, कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच प्रमुख रस्त्याचा वापर करून कोकणात जाण्यासाठी,नॅशनल 48 ला जाण्यासाठी, मुंबई पुणे एक्सप्रेस वर जाण्यासाठी नव्याने चालू होत असलेला समृद्धी महामार्ग ला जाण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे कल्याण फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते तरी या संदर्भात आपण तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या उड्डाणपुलासाठी आपण निधी मंजूर करावा व कामाला गती द्यावी असे रोहिदास मुंडे यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.