मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता
आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश
अक्षराज : वसंत रांधवण
दि.५,पारनेर (अहिल्यानगर ) : बुधवार दि. ४ जुन २०२५ रोजी मुंबई मंत्रालय, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असल्याची माहिती आ. काशिनाथ दाते यांनी दिली.
पारनेर-नगर मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना पंधरा दिवसापूर्वी गोदावरी खोऱ्यातील नव्याने प्रस्तावित केलेले वासुंदे तांबडीकार, मोरवाडी, निमदरी व वारणवाडी या ठिकाणचे बंधारे तसेच मांडओहळ धरणाचे डाव्या कालव्याची गळती थांबवावी, कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामासाठी बैठक लावण्याची विनंती मंत्री ना. विखे यांना केली होती. गळतीमुळे हा कालवा पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत नव्हता. त्यामुळे आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विशेष दुरुस्तीसाठी निधीची मागणी लावून धरली होती. ती विनंती तात्काळ मान्य करून आमदार दाते यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यांची मंत्रालयाच्या दालनामध्ये बैठक बोलावली. त्या बैठकीत या कामांचे सादरीकरण करण्यात आले व चर्चेतून निर्णय घेण्यात आला जलसंपदा मंत्री यांनी जलसंपदा विभागाला सव्वीस किलोमीटर लांबीच्या कालवा दुरुस्ती अस्तरीकरण व वितरिका दुरुस्ती २० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे आदेश दिले यावेळी ना. विखे यांनी सर्व अधिकारी यांना संबोधित करत असताना पारनेर हा सततचा दुष्काळी तालुका आहे त्यामुळे तेथे जलसिंचनाचे जेवढे जास्तीत जास्त स्रोत निर्माण करता येतील तेवढे प्राधान्य या कामाला अधिकाऱ्यांनी द्यावे, गोदावरी खोऱ्यातील वळण बंधाऱ्यातून उपलब्ध होणारे पाण्यातून आमदार दाते यांनी प्रस्तावित केलेले वासुंदे तांबडीकार, मोरवाडी, निमदरी व वारणवाडी या कामांना देखील चालना द्यावी अशा सूचना देखील या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मतदारसंघातील या कामांच्या- साठी जलसंपदा मंत्री ना. विखे पाटील, सचिव दीपक कपूर व संबंधित अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला म्हणून आ. काशिनाथ दाते यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव जलसंपदा विभाग दिपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय ढोलसरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कडा अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग जगदीश पाटील, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे इ. प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मांडओहळ धरणाचे व कालव्याचे काम होऊन जवळपास ५० वर्ष पूर्ण झाले, तीस वर्षांपूर्वी काही भागांमध्ये अस्तरीकरण काम झाले होते, परंतु आता ते देखील खराब झाले आहे, कालवा एकूण २६ कि.मी. लांबीचा असून संपूर्ण खडकाळ भागातून गेल्यामुळे खडकाचे सपामधून मोठ्या प्रमाणावर गळती होते, अस्तरीकरण संपूर्ण झाल्यास वाया जाणारे पाणीची बचत होवुन त्यावर असलेले पिण्याचे पाणी योजना तसेच वासुंदे, खडकवाडी, पळशी येथील शेतीला सुद्धा आवर्तन परिपूर्ण मिळेल, मांड ओहळ नदीवरील बंधारे सुद्धा भरून घेणे शक्य होणार आहे.
– आ. काशिनाथ दाते (विधानसभा सदस्य)