पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ?
पेट्रोलिंग कुठं गायब झालंय? डीबी पथक झोपेत आहे का?
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०८, येरवडा (पुणे) : लोक ओरडतात “सुरक्षा कुठंय?” आणि प्रशासन मात्र शांत!
पोलीस निष्क्रिय, गुंड सक्रीय — येरवड्यात कायदा गुंडांच्या पायाशी पडला का?
येरवड्यात १०-१२ जणांचा दहशतीचा हल्ला — लक्ष्मीनगरात शस्त्रांसह धुमाकूळ
येरवडा परिसर पुन्हा एकदा दहशतीच्या सावटाखाली आला आहे. दि.०७ मंगळवार संध्याकाळ लक्ष्मीनगर भागात तब्बल १० ते १२ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येत शस्त्रांसह रस्त्यावर धुमाकूळ घातला. आरडा-ओरडा, धमक्या आणि वाहनांची तोडफोड करत त्यांनी परिसरात अक्षरशः अराजक माजवले.
हल्लेखोरांनी हातात कोयते, काठ्या आणि तलवारी घेत नागरिकांना घाबरवत अनेक दुचाकी, चारचाकी व दुकानांवर दगडफेक केली. अचानक उफाळलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून स्वतःचा जीव वाचवला.
स्थानिकांच्या मते, “हे टोळके गेल्या काही दिवसांपासून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. रात्री उशिरा फिरून लोकांना धमकावणे आणि विरोध करणाऱ्यांवर शस्त्रांनी हल्ला करणे” हे त्यांचे रोजचेच झाले आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखा युनिट-४ आणि स्थानिक गस्ती पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमाव पांगवला व काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र काहीजण अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

महिला व मुलावर तलवारीने हल्ला :
दरम्यान, या घटनेत आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लक्ष्मीनगर परिसरातील एका घरात घुसून महिला व तिच्या मुलावर तलवारीने वार करून धमकी देण्यात आली.
माहितीनुसार, आरोपी जहुर शेख, सुलतान खान, आझाद खान आणि मुस्तफा खान यांनी “माझ्या आईला का मारले?” असा आरडा-ओरडा करत घरात घुसून तलवारीने हल्ला केला. या दरम्यान त्यांनी “मेरे पेर पड” अशी वर्तणूक करत महिलेला शिव्या मारल्या आणि धमक्या दिल्या.
या सलग घटनांमुळे येरवडा परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिस आयुक्तांकडे मोक्का सारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली असून, वाढती गुन्हेगारी आता प्रशासनासाठी गंभीर आव्हान ठरत आहे.