लोकसहभागातून निवडुंगेवडी येथिल तलावाचे खोलीकरण
अक्षराज : वसंत रांधवण
दि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : टाकळी ढोकेश्वरच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत भूमिपुत्रांनी सोशल मीडियावर आम्ही टाकळीकर ग्रुपच्या माध्यमातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र येत बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रत्येक प्रकल्प प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी केले.

टाकळी ढोकेश्वर येथिल ग्रामस्थ व टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावात मोठी जलसंधारण चळवळ उभी केली आहे. गाव पाणीदार करण्यासाठी असंख्य हात पुढे येत असून पाणी अडविण्यासाठी व जिरविण्यासाठी टाकळी ढोकेश्वर परिसरात सुरू असलेल्या जलसंधारणाच्या दुसरा टप्प्यातील केटिवेअर खोलीकरण,निवडुंगेवाडी तलावात खोलीकरण कामांची पाहणी करताना डॉ. भाऊसाहेब खिलारी बोलत होते. डॉ. खिलारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाची सविस्तर माहिती घेतली तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या.
यावेळी आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव जेष्ठ पत्रकार चाॅंद शेख, प्रतिष्ठानचे समन्वयक सदस्य प्रताप खिलारी, संतोष सोनवळे, ढोकेश्वर सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष दिगंबर शेळके (मेजर), ग्राम पं. सदस्य दत्तात्रय निवडुंगे, संदिप खिलारी, आदिनाथ पायमोडे आदी उपस्थित होते. नाम फाऊंडेशन व आम्ही टाकळीकर, ग्रामपंचायतसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जलसंधारण कामाचा दुसरा टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. या जलसंधारण कामाला तरुण वर्ग व ग्रामस्थ भरभरून योगदान देत आहेत.
“विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांनी बार वर्षांपूर्वी एकत्र येत आम्ही टाकळीकर ही ग्रामविकासाची चळवळ उभारली. त्या माध्यमातून बारा वर्षात ४७ लाख रुपयांचे १६ लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यात आले आहे. आता जलसंधारण चळवळ होती घेऊन संपूर्ण गाव पाणीदार करण्यात येणार आहे. यावर्षी दशक्रियाविधी घाट ते निवडुंगेवाडी तलावात या मुख्य ओढ्यावर सहा मोठे केटीवेअरचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी तलाव व गावातील ओढ्याचे खोलीकरण व स्वच्छता करण्यात येणार आहे. या जलसंधारण चळवळीत तरूण व ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवावा.”
— डॉ.भाऊसाहेब खिलारी, अध्यक्ष सावली प्रतिष्ठान, टाकळी ढोकेश्वर



