‘नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रार करूनही कारवाई नाही’
शिळगांव, ग्रीन पार्क, नाईस सिटीतील, नागरिक भयभीत
अक्षराज : विनोद वास्कर
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०४, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा परिसरातील ग्रीन पार्क आणि नाईस सिटी भागात असलेल्या केमिकल गोदामांमुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्यात केमिकल्स आणि सर्व रसायने मिक्स होऊन रस्त्यावर वाहत आहेत. तरीही ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नगरसेवकांनी केली तक्रार, तरीही कारवाई शून्य…
या धोकादायक परिस्थितीबाबत नगरसेवक बाबाजी पाटील आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी देखील ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असे नागरिक सांगतात.
“लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, तक्रार दिली. पण ठामपाचे अधिकारी झोपले आहेत का? केमिकल पाण्यात मिसळून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे तरी कारवाई का होत नाही?” असा संतप्त सवाल शिळफाटाकर विचारत आहेत.
पावसामुळे धोका वाढला !
ग्रीन पार्क आणि नाईस सिटी परिसरात बेकायदेशीरपणे अनेक केमिकल गोदामे आहेत. मुसळधार पाऊस पडल्यावर त्यातील रसायने पाण्यासोबत वाहून येतात. त्यामुळे त्वचा विकार, डोळ्यांची जळजळ, श्वासाचा त्रास होण्याची शक्यता आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिक सर्वात जास्त धोक्यात आहेत.
नागरिकांची मागणी…
१) तक्रारीनंतरही दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर* कारवाई करावी.
२) बेकायदेशीर केमिकल गोदामे तातडीने सील* करून तेथील रसायने सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
३) पावसाच्या पाण्याची आणि मातीची तपासणी करून प्रदूषणाचा अहवाल जाहीर करावा.
४) आयुक्तांनी स्वतः पाहणी करून ७ दिवसांच्या आत कारवाई करावी.
“नगरसेवकांनी तक्रार करूनही जर ठामपा ऐकत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे न्याय मागायचा? एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का?” अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई न झाल्यास नागरिक आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.



