महापालिकेने दिव्यात तातडीने डास नियंत्रण धूर फवारणी करावी ज्योती पाटील यांची मागणी
अक्षराज : विनोद वास्कर
दि.१३, दिवा(ठाणे) : सलग तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर दिवा शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील अनेक भागांमध्ये कचरा साचून राहिल्याने तसेच काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
ही बाब लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ज्योती पाटील म्हणाल्या की, शहरातील प्रत्येक प्रभागात साचलेला कचरा त्वरित हटवून स्वच्छता करण्यात यावी. तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास नियंत्रण धूर फवारणी आणि औषध फवारणीची विशेष मोहीम राबवण्यात यावी.
नागरिकांच्या आरोग्याचा विषय असल्याने महापालिकेने कोणतीही दिरंगाई न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.



