ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…
अक्षराज : संजय पंडित
दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला जातो.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील अत्यंत महत्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवार दि. ८ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवार ९ मे रात्री १२ वाजेपर्यंत सलग चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पावसाळ्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, केल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र.२६व ३१चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं.२, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
दरम्यान पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.या शटडाऊन कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.