पारनेर तहसील कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव…
वृद्ध नागरिक व महिलांना सर्वाधिक अडचणी
अक्षराज : वसंत रांधवण
दि.२९, पारनेर (अहिल्यानगर) : शहरातील तहसील कार्यालय डिजिटल युगात प्रवेश करत असताना देखील, येथिल भौतिक सुविधांचा पुरता अभाव आहे. नागरिकांची कामे ऑनलाईन पद्धतीने होत असली, तरी तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय वाईट असल्याने त्याचा वापरही नागरिकांना करता येत नाही. व इतरही मूलभूत गरजांची कमतरता आहे. यामुळे भ्रष्टाचारात गुंतलेल्या तहसील कार्यालयाला जाग कधी येणार हा प्रश्नच आहे.
अनेकदा तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या पाण्यासाठी विकत पाणी घेवून तहान भागवावी लागते. कार्यालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याची टाकी, शुद्ध पाण्याची सोय किंवा फील्टर यापैकी काहीच उपलब्ध नाही. परिणामी, उन्हाळ्याच्या या तडाख्यात लोकांना तहसीलमधील कामासोबतच पाण्याच्या शोधासाठी वणवण करावी लागत आहे.

कार्यालयात शौचालय असून ते वापरत नसल्याने तेथे घाणीचे साम्राज्य पसरले असून साफसफाई केली गेली नाही. नागरिक व कर्मचारी लघुशंका किंवा शौचालयासाठी इतरत्र भटकंती करावी लागते.
सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर जेष्ठ नागरिकांनाही तहसील कार्यालयात योग्य प्रकारची वागणूक मिळत नाही. वयोवृद्ध नागरिकांना रांगेत तासन् तास आपल्या कामासाठी उभे रहावे लागते. त्यांच्यासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था नाही, तसेच एखादी सावली किंवा निवांतपणे विश्रांती घेता येईल अशी जागाही नाही. अनेक जेष्ठ नागरिक तहसील कार्यालयाच्या या असुविधांबाबत नाराजी व्यक्त करताना दिसतात.
डिजिटल यंत्रणा आली खरी, पण आम्हाला अजून मुलभूत गोष्टी मिळालेल्या नाहीत. आम्ही वृद्ध माणसे तासन् तास उभे राहातो, कोणी विचारत नाही,असे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. या संपूर्ण परिस्थिवर प्रशासनाने डोळे झाकलेली असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येतात.
त्यामध्ये महिला, वृद्ध,दिव्यांग अशा विविध गटांतील लोकांचा सामावेश असतो. तरीदेखील नागरिकांच्या सोयीसाठीआवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
सर्वत्र डिजिटल क्रांतीचा गजर असताना, तहसील कार्यालय मात्र मूलभूत सोयींअभावी मागे पडले आहे. ऑनलाईन सेवा आणि ई – गव्हर्नन्सच्या नावाखाली लाखो रुपये खर्च होत असताना, फक्त काही हजार रुपयांत सुटणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी व स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी कोणी पुढाकार घेत नाही, हे दुर्दैवाचे आहे.
प्रशासनाकडून या बाबतीत केवळ कोरड्या घोषणा होत आहेत, प्रत्यक्षात कृती मात्र शुन्य आहे. नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. तहसील कार्यालयाचा कारभार फक्त ऑनलाईन सुविधांवर चालवणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष येणाऱ्या नागरिकांची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.