टॅक्सी व रिक्षांच्या भाडेदरात वाढ : सुधारित दर आजपासून लागू
अक्षराज : जे. के. पोळ
दि.०१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील सीएनजी चालित काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६८ अन्वये गठित या प्राधिकरणाची बैठक २० ऑगस्ट २०२६ रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
वाहनांच्या सरासरी किंमतीत, ग्राहक निर्देशांकात आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात झालेली वाढ लक्षात घेता, शासन निर्णय दिनांक ९ मार्च २०२० द्वारे स्वीकृत खटुआ समितीच्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
सुधारित भाडेदरांचा तपशील…
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी) रुपये ३१/- वरून वाढवून रुपये ३३/- करण्यात आले आहे. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे रुपये २०.६६ वरून वाढवून रुपये २१.९० करण्यात आले आहे.
ऑटोरिक्षा (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी) रुपये २६/- वरून वाढवून रुपये २७/- करण्यात आले आहे. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे रुपये १७.१४/- वरून वाढवून रुपये १८.२२/- करण्यात आले आहे.
अंमलबजावणी व अटी :
ही भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व सीएनजी काळी-पिवळी मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षांना लागू राहील. उपरोक्त भाडेदर आज दिनांक ०१/०९/२०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.
सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेणे बंधनकारक असून, जे परवानाधारक रिकॅलीब्रेशन करून घेतील, केवळ त्याच ऑटोरिक्षा व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक ०१/०९/२०२६ ते दिनांक ३०/११/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे रोहित काटकर यांनी दिली आहे.



