युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी आपली काळजी कशी घ्यावी ??
अक्षराज : जे. के. पोळ
दि.०७, ठाणे : युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
१. प्रशासनामार्फत हवाई हल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजविल्या जाणाऱ्या सायरनचा आवाज आल्यानंतर त्वरीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यांत यावा. सायरन २ मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी गॅस लाईन बंद करून इमारतीच्या खाली येवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

२. सायरन एकाच आवाजामध्ये २ मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सूचना मिळत असते, त्यावेळी सर्व नागरीकांनी ज्या ज्या ठिकाणी आश्रय घेतला आहे त्याठिकाणावरून सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करून तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण केंद्रास देण्यात यावा की जेणेकरून आपल्याला त्वरीत मदत उपलब्ध करता येईल.
३. सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्यासोबत पिण्याच्या पाण्याचा साठा, कोरडे अन्न (ड्रायफुड), तसेच औषधे सोबत ठेवावेत.
४. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, आपल्यासोबत रेडिओ, मोबाईलचा वापर करा की जेणेकरुन प्रशासनानी वारंवार दिलेल्या सुचनांचे आपणांस पालन करता येईल.
५. प्रकाशबंदी (ब्लॅक आउट) नियमासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे.
६. युध्दजन्य परिस्थितीमध्ये कोणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल.
७. युध्दजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरुन न जाता लोकांचे मनोधैर्य उंचावणे महत्वाचे आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.